महाराष्ट्र

नथुराम विरुद्ध तुकारामाची लढाई” – कीर्तनकाराची धमकी आणि आव्हाडांचा संताप! थोरातांना धमकीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ, गोडसे प्रवृत्तीचा जाहीर निषेध

महाराष्ट्र (प्रतिनिधी) –
राज्याच्या राजकीय वातावरणात सध्या भीषण खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली. “बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल हा..!” असे शब्द भंडारे यांनी उच्चारल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्याने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

आव्हाडांचा संताप – “ही लढाई नथुराम विरुद्ध तुकारामाची!”
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं –
“ही लढाई नथुराम विरुद्ध तुकारामाची आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. इथं द्वेषाची भाषा नव्हे तर मानवतेचा संदेश देण्यात आला. मात्र, गोडसे प्रवृत्तीचे डाव महाराष्ट्र कधीच सहन करणार नाहीत.”

आव्हाड पुढे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व विरोधकांनीसुद्धा नेहमी आदराने मान्य केलं आहे. अशा सुसंस्कृत नेत्याला धमकी दिली जाणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर थेट आघात आहे. भाजपच्या राजकारणात धर्माच्या नावाखाली समाजात विष कालवण्याचा डाव सुरू आहे. पण हा डाव महाराष्ट्रातील वारकरी, संत परंपरा आणि पुरोगामी जनता उधळून लावेल.

“गोडसे प्रवृत्तीचा निषेध!”
आव्हाड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की – “आम्ही गोडसे प्रवृत्तीचा निषेध करतो आणि बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचाही सरकारवर प्रहार
या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले –
“संगमनेरमध्ये कीर्तन सांगणारा एक व्यक्ती खुलेआम नथुरामाची भाषा बोलतोय! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात समाजातील विघातक प्रवृत्तींना विरोध करतात, म्हणून त्यांना धमक्या दिल्या जातात? हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारे नाही. गृहमंत्र्यांना आमचा थेट सवाल आहे – राज्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? आज कीर्तनकार धमक्या देतात, उद्या गुन्हा दाखल करण्याची धमकी देतील, तर हा अराजकवाद नाही का?”

वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण कधीही इतक्या खालच्या थराला गेले नव्हते. “हे सरकार खरोखरच नागरिकांच्या सुरक्षेसाठी जागं आहे की नाही, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे.”

बाळासाहेब थोरातांचा ठाम आवाज – “मी गांधी नाही, पण बलिदानासाठी तयार!”
दरम्यान, धमकीला उत्तर देताना बाळासाहेब थोरात यांनी संत परंपरेला साजेशी भूमिका घेतली. ते म्हणाले –
“मी गांधी नाही, पण विचारांसाठी आनंदाने बलिदान द्यायला तयार आहे. समाजात विघातक प्रवृत्ती वाढू देणार नाही. गोडसेच्या हिंसक विचारांवर महाराष्ट्र कधीच शिक्कामोर्तब करणार नाही.”

त्याचबरोबर, थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवरही निशाणा साधला. “ते एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखं बोलत आहेत. जर त्यांना एवढं राजकारण करायचं असेल, तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा,” असा टोला त्यांनी लगावला.

एकंदरीत, महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गोडसे प्रवृत्ती’ विरुद्ध ‘तुकाराम विचार’ असा संघर्ष उभा ठाकला आहे. आव्हाड, वडेट्टीवार, थोरात यांनी दिलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहता असं दिसतं की, महाराष्ट्रात द्वेष आणि हिंसेला जागा नाही. संत परंपरेची भूमी आजही प्रेम, सत्य आणि अहिंसेवरच उभी आहे. आणि जर कोणी गोडसेची भाषा बोलण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता त्यांना उत्तर देईल – विचारांनी, आंदोलनांनी आणि लोकशक्तीच्या ताकदीने!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button